नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील पाच महसूली मंडळाचा दुष्काळसदृश यादीत समावेश झाल्याने दुष्काळाच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपोषण मागे घ्यावे असा निरोप दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणाला तिसरा दिवस होता. नांदगावचे तहसीलदार डॉ .सिद्धार्थ मोरे, तालुका कृषी अधिकारी आर. जी. डमाळे
यांनी उपोषणस्थळी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय पाटील यांना पाणी दिले. पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी दुष्काळ जाहीर होईपर्यंत उपोषण आंदोलन सुरु केले होते. उरलेली तिन्ही मंडळे लवकर जाहीर होतील असेही छगन भुजबळ यांनी कळविल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी संचालक अमित पाटील, विनोद शेलार, प्रसाद सोनवणे, सोपान पवार, राजेंद्र लाठे, बाळासाहेब देहाडराय. माजी नगराध्यक्ष अरुण पाटील माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर गौतम जगताप, दिगंबर सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment